
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत ४० टक्के वाढ झाली आहे. तरीही भारतात किरकोळ तेलाच्या विक्रीदरात वाढ झालेली नव्हती. त्यामुळे तेल कंपन्या तोट्यात जाऊ लागल्या आहेत. अखेर तेल कंपन्यांनी घाऊक डिझेलच्या दरात लीटरमागे २५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र किरकोळ डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घाऊक डिझेल दरवाढीचा फटका मालवाहतुकीला बसणार असल्याने महागाई वाढणार आहे.
नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलची विक्री वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी बस वाहतूकदारांच्या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा होत आहे. नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल आदी कंपन्यांना मोठा तोटा होत आहे. त्यामुळे या कंपन्या पेट्रोल पंप बंद करण्याच्या विचारात आहेत. २००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील १४३२ पेट्रोल बंद केले होते. त्यावेळी विक्री ‘शून्या’वर आली होती.
मुंबईत १२२.०५ लीटर घाऊक डिझेल
मुंबईत घाऊक विक्रेत्यांसाठी डिझेल १२२.०५ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर पेट्रोल पंपावर ९४.१४ रुपये प्रति लीटर झाले आहे. दिल्लीत किरकोळ डिझेल ८६.६७ रुपयांना, तर घाऊक डिझेल ११५ रुपये लीटरने मिळत आहे. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तरीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही.
घाऊक खरेदीदार कोण?
राज्य वाहतूक महामंडळ, मॉल्स, विमानतळ आदींना विजेच्या बॅकअपसाठी वीज निर्माण करायला डिझेल लागते. ते घाऊक डिझेलचे मोठे खरेदीदार आहेत.