शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा?तुरुंगातून संजय राऊत यांचे भावनिक पत्र

शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा?तुरुंगातून संजय राऊत यांचे भावनिक पत्र

न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहित आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून आईला लिहिलेल्या भावनिक पत्राने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवली आहे. ‘आई, मी नक्कीच परत येईन. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. या कठीण काळात मी उद्धव ठाकरेंना सोडले, तर उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू? प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच’, अशा शब्दात राऊत यांनी आपल्या आईला पत्रातून समजूत घालण्याचा प्रयत्न करीत धीर दिला आहे.

राऊत यांनी पत्रात लिहिलेय की, ‘आताच माझी ‘ईडी’ कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहित आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आला आहे. रविवारी (१ ऑगस्ट) ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले, तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली, तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे, हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस; पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये’ म्हणालीस, खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज ‘सामना’त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता, आई, मी नक्कीच परत येईन.

माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी गन पॉइंटवर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’ वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस’, असे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.

...तर बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

‘शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, अनेक जण जायबंदी झाले. कुणी प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जीवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?’ असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

या छळातून नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील!

‘आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल.

भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले, तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय, आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ला करू लागला, तेव्हा काहीतरी करा, शिवसेना वाचवा, असे सांगणारी तूच होतीस. हे लोक का फुटले? यांना काय कमी पडले होते? असा प्रश्नही तू विचारीत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस शिवाजी शेजाऱ्याच्या घरात का जन्माला यावा, हा प्रश्न असतोच’.

आई, मी नक्की परत येईन!

‘जशी तू माझी आई आहेस, तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल, अशा धमक्या देण्यात येत होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही. या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी नक्की परत येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे,’ असे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in