
मुंबई : वरळीच्या लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जन करताना दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार आणि पोलिसानी तत्काळ तिघांचा शोध सुरू केला. संतोष विश्वेश्वर (५१), कुणाल कोकाटे (४५) अशी मृतांची नावे आहेत. संजय सरवणकर हे जखमी झाले. वरळी येथील लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जनाचा विधी सुरू असताना लाटांच्या प्रवाहासोबत तिघेजण वाहून गेले.
यावेळी लोकांनी आरडाओरड केल्यानंतर सायंकाळी ५.४० वाजता समुद्रात तीन जण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिघांना पाण्यातून बाहेर काढले. तिघांनाही नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर जखमीची प्रकृती आता स्थिर आहे.