
मुंबई : वरळी-शिवडी एलिवेटेड कनेक्टर प्रकल्पाला वेग देण्यासाठी एमएमआरडीएने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रकल्पग्रस्त ८३ कुटुंबांना नवीन पुनर्वसन धोरणानुसार घर किंवा रोख भरपाई यापैकी एकाची निवड करायची आहे.
हाजी नुरानी चाळ आणि लक्ष्मी निवास येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भातील बैठक ९ एप्रिल रोजी समाज विकास कक्षाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीस प्रकल्पग्रस्त कुटुंबे आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी त्यांना नवीन भरपाई योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रकल्पामुळे हाजी नुरानी चाळीतील २३ आणि लक्ष्मी निवासमधील ६० कुटुंबे बाधित झाली आहेत.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, भरपाईची रक्कम रहिवाशांच्या जागेच्या क्षेत्रफळावर आधारित असून ती सुमारे ३० लाखांपासून १.१० कोटींपर्यंत असू शकते. या बैठकीदरम्यान, अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त रहिवाशांच्या शंकांचे निरसन केले.