मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा लावून धरला असताना आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातील मतदार यादीतील घोळाचा भांडाफोड केला आहे. लोकसभा निवडणुकीत मृत मतदार विधानसभा निवडणुकीत मतदान करतो आणि नंतर त्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून डिलीट केले जाते. वरळीतील १९ हजार ३३३ मतदार संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी आपल्या मतदारसंघातील बोगस मतदारांचा शोध घ्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी गट प्रमुख, पदाधिकाऱ्यांना केले आहे. वरळीतील डोम येथे आयोजित निर्धार मेळावा, संकल्प विजयाचा कार्यक्रमात ते बोलत होते.
मे २०२४ मध्ये लोकसभा तर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या.
वरळीत लोकसभा निवडणुकीत २,५२,९७० मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत २,६३,३५२ मतदार होते. चार महिन्यात थोडेफार मतदार वाढले हे समजू शकतो. परंतु लोकसभा निवडणुकीत नरहरी कुलकर्णी हे मृत दाखवले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत नरहरी कुलकर्णी यांनी मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आगामी निवडणुकीत बोगस मतदानाचा प्रकार घडू शकतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत बोगस मतदान टाळण्यासाठी प्रत्येक गट प्रमुख, पदाधिकारी यांनी मतदारसंघातील एका एका घरात किती लोक, एका घरात १० हून अधिक लोक तर त्या घरावर मार्क करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.
यावर फोकस करा
डुप्लिकेट मतदार, फोटो नाही ते मतदार, मृत व्यक्ती मतदार, मतदान ओळखपत्रावर पत्ता नाही, अनेक मतदार एकाच पत्त्यावर वास्तव्यास.