चिंता मिटली! मुंबईकरांना एप्रिलपर्यंत पाण्याचे नो टेन्शन ; मोडक सागर ओव्हर फ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात पैकी चार तलाव तुडूंब भरले असून पाणी कपात रद्दचा निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे.
चिंता मिटली! मुंबईकरांना एप्रिलपर्यंत पाण्याचे नो टेन्शन ; मोडक सागर ओव्हर फ्लो

मुंबई : दडी मारलेल्या पावसाची मुंबईला पाणीपुरवठा धरण क्षेत्रात दमदार इनिंग सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी एक असलेला मोडक सागर गुरुवारी रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. या सात धरणात २८ जुलै रोजी ६८.६ टक्के म्हणजेच ९ लाख ८५ हजार १३० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

दरम्यान, सात धरणांपैकी चार तलाव आठ दिवसांत ओव्हर फ्लो झाल्याने २५५ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा एप्रिलपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका उपलब्ध असल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू असून धरणातील पाणीसाठ्याची उपलब्धता बघता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात १० टक्के पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आणि १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून धरण क्षेत्रात वरुणराजाची दमदार इनिंग सुरु असल्याने पाण्याचा पातळीत वाढ होत आहे.

सात धरणांपैकी तुळशी तलाव २० जुलै रोजी मध्यरात्री १.२८ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. तर विहार तलाव २६ जुलै रोजी मध्यरात्री १२.४८ मिनिटांनी तर तानसा तलाव ही २६ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी फुलं झाला व त्यानंतर गुरुवार रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी मोडक सागर ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

दरम्यान, मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. २८ जुलै २०२३ रोजी सातही धरणात ९ लाख ८५ हजार १३० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

सात धरणांतील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा - ९७,१४१

मोडक सागर - १,२८,९२५

तानसा - १,४४,४७५

मध्य वैतरणा - १,५४,२४९

भातसा - ४,२४,५९६

विहार - २७,६९८

तुळशी - ८,०४६

तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

२०२३ - ९,८५,१३०

२०२२ - १२,७६,११६

२०२१ - १०,१३,८७०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in