
मुंबई : राज्यातील तापमान वाढले असून नागरिक त्यात होरपळून निघत आहेत. मुंबई, ठाणे परिसरात पारा वाढत असल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. सकाळी ९ वाजल्यापासून चटके बसत आहेत. आता भारतीय हवामान विभागाने सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. उष्ण आणि दमट परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
रविवारी, मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत किमान २४ अंश सेल्सिअस आणि कमाल ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे ११ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कमाल तापमानात ३-४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात मुंबईसह कोकणाच्या काही भागात उच्च तापमानाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तामपान जास्त होण्याची अपेक्षा आहे.