महामुंबई क्षेत्रात ३.७७ लाख घरे पडून ; देशभरात १० लाख घरे विक्रीविना

भारतातील सात मोठ्या मेट्रो शहरांमध्ये १० लाख ३६ हजार ८६० घरे विक्रीविना पडून असल्याचे उघड
महामुंबई क्षेत्रात ३.७७ लाख घरे पडून ; देशभरात १० लाख घरे विक्रीविना

घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. कर्ज काढून, पै-पै जमवून लोक घर घेतात. आता घरांच्या किमतीही कोट्यवधींच्या घरात पोहोचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न राहील की काय? अशी चिन्हे दिसत आहेत. भारतातील सात मोठ्या मेट्रो शहरांमध्ये १० लाख ३६ हजार ८६० घरे विक्रीविना पडून असल्याचे उघड झाले आहे. मुंबई प्रादेशिक विभागात (एमएमआर) ३,७७,१५२ घरांना कोणतीही गिऱ्हाईक नसल्याचे आढळले आहे.

२०१९-२० मध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या ९.७७,९९३ होती, तर ३० जानेवारी २०२० मध्ये कोविडचा पहिला रुग्ण भारतात आढळला, तर मार्च २०२०मध्ये देशात लॉकडाऊन लावण्यात आला. परिणामी घरांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला. रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी "विक्रमी विक्री" करूनही खरेदी न केलेल्या घरांमध्ये वाढ झाली आहे.

भारतातील मोठ्या ८ शहरांत नवीन घरांचा पुरवठा सुरू झाला आहे. २०२३ मध्ये त्याची किंमत ५ लाख कोटी रुपये आहे, तर २.९ लाख कोटी रुपयांची घरांची विक्री झाली. तर गेल्यावर्षी विकल्या न गेलेल्या घरांची किंमत १.३ लाख कोटी रुपये आहे, असे ‘लिआस फोरास’ या कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर यांनी सांगितले.

‘लिआस फोरास’च्या माहितीनुसार, कोविडपूर्व काळात एमएमआर क्षेत्रात न विकलेल्या घरांची संख्या मार्च २०२३ मध्ये २,९३,३७६५ वरून २८.५५ टक्क्याने वाढून ३,७७,१५२ वर पोहोचली आहे. हैदराबाद येथे न विकलेल्या घरांची संख्या ९४३१६ आहे. अहमदाबाद येथे न विकलेल्या घरांची संख्या जास्त आहे.

घरे न विकण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे नवनवीन प्रकल्प सुरू होणे हा आहे. दरवर्षी नवीन प्रकल्प येत आहेत. चेन्नई (४०५ टक्के), कोलकाता (१०२ टक्के), दिल्ली एनसीआर (७३ टक्के), बंगळुरू (५२ टक्के), पुणे (२८ टक्के), एमएमआर (११ टक्के), अहमदाबाद (१० टक्के), हैदराबाद (६ टक्के) येथे प्रकल्प सुरू झाले आहे.

शिल्लक घरांची विक्री करण्यासाठी चेन्नईत ६१ महिने, एमएमआर (५२ महिने), एनसीआर (४४ महिने), कोलकाता (३९ महिने), अहमदाबाद (३८ महिने), हैदराबाद (३१ महिने), पुणे (२४ महिने) आणि बंगळुरू (२२ महिने) लागू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in