नवी दिल्ली : २०१२ ते २०२१ दरम्यान पूर व मुसळधार पावसाने देशात १७ हजार जणांचा बळी गेल्याचे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले.
राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी सांगितले की, अल्पावधीत जास्त पाऊस पडल्याच्या घटना वाढत असल्याने शहरी भागात पुराचे प्रमाण वाढत आहे. बेसुमार वाढ, पाण्याच्या साठ्यांवर अतिक्रमणे, पाणी वाहून नेण्यासाठीची खराब व्यवस्था यामुळे पाणी साचत आहे.
तुडू यांनी सांगितले की, २०१२ ते २०२१ दरम्यान पाऊस व पुरात १७४२२ जणांचा बळी गेला आहे. पूर व मुसळधार पावसामुळे शहर व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत पिके, घर, सार्वजनिक सुविधांचे २,७६,००४.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, तर शहरी पूरग्रस्त भागात अनेक नैसर्गिक उपाय केले आहेत. सरकारने जमिनीतील भूजल पुनर्भरणासाठी मास्टर प्लॅन बनवला आहे. त्यासाठी १.४२ कोटी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प उभारले आहेत. त्यातून १८५ अब्ज क्युबिक मीटर पाणी साठवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.