राज्यसभेतही विरोधी पक्षांचे १९ खासदार निलंबित ; एका आठवड्यासाठी निलंबन

राज्यसभेतदेखील कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या विरोधी पक्षांच्या १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
राज्यसभेतही विरोधी पक्षांचे १९ खासदार निलंबित ; एका आठवड्यासाठी निलंबन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही विरोधी पक्षांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. वाढती महागाई, गुजरातमध्ये विषारी दारु प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी गोंधळ घातला व चर्चेची मागणी केली. लोकसभेत सोमवारी विरोधी पक्षांच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्यसभेतदेखील कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या विरोधी पक्षांच्या १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे ७, डावे पक्ष ३, द्रमुक ६आणि तेलंगणा राष्ट्र समितीच्या ३ खासदारांचा समावेश आहे.

या खासदारांचे निलंबन

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दिवसभरात एकूण १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. यामध्ये सुष्मिता देव, मौसम नूर, शांता खेत्री, डोला सेन, शंतनू सेन, अभी रंजन बिस्वार, मोहम्मद नदीमूल हक या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तर, टीआरएसच्या लिंगय्या यादव,रवींद्र वड्डीराजू, दामोदर राव दिवाकोंडा या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. डीएमकेच्या कनिमोझी, एम.शनमुगम, एन.आर. एलन्गो, आर. गिरंजन, एस.काल्यांसुदरम, हमीद अब्दुल्ला या खासदारांना निलंबित करण्यात आले. तर, सीपीआयएमचे ए.ए. रहीम, वी. शिवदासन आणि भाकपचे संतोष कुमार पी यांचे निलंबन करण्यात आले आहे.

चर्चा करण्यास परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन केले व सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे १९ खासदारांवर आठवडाभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या अधिवेशनात जीएसटी, महागाई या मुद्द्यांवर विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधी पक्ष कामकाजात अडथळा आणत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तर सरकार प्रश्नांवर चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in