
नवी दिल्ली : भारताने बुधवारी २०२५ हे वर्ष ‘संरक्षण सुधारणा वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या वर्षात ‘युनिफाइड मिलिटरी कमांड’ची स्थापनाही केली जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत २०२५ हे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या वर्षात संरक्षण मंत्रालय सायबर आणि स्पेससारख्या नवीन क्षेत्रांवर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहे. लष्करी क्षमतेच्या जलद विकासासाठी मंत्रालयाकडून संपादन प्रक्रिया सुलभ आणि कालबद्ध केली जाणार आहे. संरक्षण सुधारणांमुळे एकसंध लष्करी कमांड स्थापन करणे सुलभ होईल, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
उदयोन्मुख तंत्रज्ञान
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सशस्त्र दलांना बहु-डोमेन इंटिग्रेटेड ऑपरेशन्स करण्यास सक्षम असलेल्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि लढाऊ-तयार दलामध्ये बदलण्यासाठी सुधारणा उपाय लागू केले जातील. मंत्रालयाने सांगितले की, २०२५ मध्ये सायबर आणि स्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, हायपरसोनिक्स आणि रोबोटिक्ससारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाईल.
महत्त्वाचे पाऊल
सुधारणांचे वर्ष हे सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल असेल. यामुळे देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये अभूतपूर्व प्रगतीचा पाया घातला जाईल आणि अशा प्रकारे २१व्या शतकातील आव्हानांमध्ये राष्ट्राची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्याची तयारी होईल. संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत २०२५ हे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.