नवी दिल्ली : चीनने २०२० साली लडाखमध्ये घुसखोरी केल्यानंतर भारत आणि चीन यांच्या लष्करांमधील चर्चेची २१वी फेरी बुधवारी पार पडली. त्यात दोन्ही देशांनी लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) शांतता राखण्याचे मान्य केले आहे.
लडाख प्रदेशातील चुशुल आणि मोल्डो सीमेवर भारत आणि चिनी लष्करांच्या कोअर कमांडर स्तरावरील बैठक सोमवारी पार पडल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले. लडाखच्या सर्व प्रदेशातून चीनने घुसखोरी केलेले सैन्य मागे घ्यावे, या मुद्द्यावर यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये भारत ठाम राहिला आहे. याही वेळ भारताने भारताने आपली बाजू समर्थपणे मांडली. चर्चा मैत्री आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. दोन्ही बाजूंनी एकेमेकांच्या संपर्कात राहण्याचे, लष्करी आणि मुत्सद्दी माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवण्याचे आणि उर्वरित मुद्द्यांवर लवकरात लवकर परस्पर स्वीकारार्ह निर्णय घेण्याचे मान्य केले.