भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहिंतेच्या काळात तब्बल ३४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ४०.१८ कोटी रुपयांची रोख रक्कम, १७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, मद्य, तसेच दागिने आणि मौल्यवान दागिने मिळून २८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
९ ऑक्टोबर पासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून विधानसभा निवडणुकीत २३० मतदारसंघात मतदान शुक्रवारी करण्यात आले. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.
मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन यांनी सांगितले की, अमलबजावणी संस्थांनी राज्यभरात आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध भागांमद्ये कारवाई केली. यात मद्य, अंमली पदार्थ रोख रक्कम, मौल्यवान धातू, सोने-चांदीते दागिने मिळून फ्लाइंग सर्व्हिलन्स टीम आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम तसेच पोलीस यांनी ही मावमत्ता जप्त केली.
९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२३ या काळात ही कारवाई केली. या पथकांनी ४०.१८ कोटी रुपये रोख रक्कम, ३४.६८ लाख लीटर इतका बेगायदा मद्यसाठा त्याची किंमत ६५.५६ कोटी रुपये, १७.२५ कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, सोने चांदी व अन्य मौल्यवान धातू ज्यांची किंमत ९२.७६ कोटी रुपये आणि अन्य वस्तू १२४.१८ कोटी रुपये अशी मालमत्ता जप्त केली असल्याचे राजन यांनी सांगितले. २०१८ मध्ये त्यावेळी झालेल्या निवडणुकांच्या काळात ७२.९३ कोटी रुपयांची अशीच मालमत्ता जप्त करण्यात आली होती, याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.