
नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लादली. या घटनेला आज, (बुधवार, २५ जून २०२५) पन्नास वर्ष होत आहेत. यानिमित्त भाजपने देशभर विविध कार्यक्रम आयोजित करून आणीबाणीच्या आठवणी जागवत कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. दरम्यान, भारतावर लादलेली आणीबाणी ही सत्तेच्या रक्षणासाठीच आणली होती, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत ‘आणीबाणीची ५० वर्षे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शहा बोलत होते.
ते म्हणाले की, आणीबाणी आणण्याचे कारण राष्ट्रीय सुरक्षा देण्यात आले. पण, सत्तेचे रक्षण करणे हेच मुख्य ध्येय होते. इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्यांना संसदेत मतदानाचा अधिकार नव्हता. पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे अधिकार नव्हते. मात्र, त्यांनी नैतिकता सोडून पंतप्रधानपदी राहण्याचा निर्णय घेतला, असे शहा म्हणाले.
हा देश कधीही हुकुमशाही सहन करत नाही. भारत हा लोकशाहीची जननी आहे. त्यांना वाटले की आपल्याला कोणीही आव्हान देणार नाही. पण, आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत गैर-काँग्रेसी सरकार बनले, असे ते म्हणाले.