रेल्वे प्रत्येक प्रवाशाला देते ५५ टक्के सवलत : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे प्रत्येक रेल्वे प्रवाशाला ५५ टक्के सवलत देत आहे. लॉकडाऊन काळात रेल्वेची प्रवासी सेवा बंद होती.
रेल्वे प्रत्येक प्रवाशाला देते ५५ टक्के सवलत : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

अहमदाबाद : रेल्वेच्या प्रत्येक प्रवाशाला त्याच्या तिकीटात ५५ टक्के सवलत दिली जात आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी वैष्णव येथे आले होते. पत्रकार व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती, त्याला त्यांनी उत्तर दिले. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लावण्यापूर्वी रेल्वेतर्फे ज्येष्ठ नागरिक व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना तिकीटात ५० टक्के सवलत दिली जात होती. त्याबाबत विचारले असता, कोणतेही थेट उत्तर न देता, वैष्णव म्हणाले, "भारतीय रेल्वे आधीच प्रत्येक रेल्वे प्रवाशाला ट्रेनच्या भाड्यात 55 टक्के सवलत देत आहे."

लॉकडाऊन काळात रेल्वेची प्रवासी सेवा बंद होती. जून २०२२ पासून रेल्वेची सेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली. पण सवलत पूर्ववत झाली नाही. तेव्हापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांसह अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

गुरुवारी, अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा वैष्णव म्हणाले, "तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी १०० रुपयांचे तिकीट काढता, तेव्हा रेल्वे तुमच्याकडून केवळ ४५ रुपये घेते. ५५ रुपये तुम्हाला सवलत देते", असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in