कुल्लू : जूनपासून हिमाचल प्रदेशवर सुरू असलेली नैसर्गिक आपत्ती थांबायला तयार नाही. मुसळधार पाऊस, पुराने राज्यात हाहाकार माजवला आहे. कुल्लू जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ३० सेकंदांत सात इमारती कोसळल्या. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाने या इमारती तीन दिवस अगोदरच रिकाम्या केल्या होत्या. जवळपासच्या ३ इमारतींना अजूनही धोका आहे. येथे लोकांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मंडी आणि शिमला येथे भूस्खलनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, ४०० रस्ते अडवले आहेत. मुसळधार पावसामुळे कुल्लू-मनाली महामार्गही बंद करण्यात आला आहे.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हिमाचलमधील शिमला, मंडी आणि सोलन या तीन जिल्ह्यांमध्ये आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.
हवामान खात्याने आज उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचवेळी दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह ६ राज्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.