
पूंछ : भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली असून ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले आहे. यामध्ये २-३ पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना ४ फेब्रुवारीच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीम (बीएटी) आर्मीचा भारतीय हद्दीत घुसून हल्ला करण्याचा मनसुबा होता, मात्र भारतीय जवानांनी चढविलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले.
ही घटना पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅलीजवळ घडली. घुसखोरांचा उद्देश भारतीय चौकीला लक्ष्य करणे होता. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमवर हल्ला केला, ही टीम सीमापार कारवाईत तज्ज्ञ आहे. या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी ‘अल बद्र’ ग्रुपचे सदस्य असू शकतात. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू, असे सांगितले होते. मात्र, तरीही घुसखोरीचा प्रयत्न सुरूच आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विधानानंतरच सरकारने ‘पीओके’च्या रावळकोटमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ला रॅलीसाठी परवानगी दिली होती. यावेळी ते बंदुका आणि एके-४७ हातामध्ये घेऊन उंचावत असल्याचे समोर आले. या रॅलीत भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. यामध्ये हमासचे नेतेही उपस्थित होते.
पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे. या संघटनेने पुन्हा एकदा भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी घुसखोर दिसताच भारतीय सैनिकांनी त्यांना प्रत्युत्तर देऊन ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘अल-बद्र’ या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
भारतीय सैनिकांवर हल्ल्याची योजना
पाकिस्तानी घुसखोरांनी ‘बॉर्डर ॲक्शन टीम’च्या मदतीने भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याची योजना आखली होती. सीमा कृती पथकांना नियंत्रणरेषेवरून छुप्या पद्धतीने हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते.