पॅलिस्टाईच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्याने त्याठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी कोणत्याही ठिकाणी युद्धाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इस्रायलमधील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारकडून या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शनिवारी सकाळी चार वाजेच्या सुमारापासून हमास या दहशतवादी संघटना हल्ले करत आहे. सकाळच्या सुमारास दोन तासांमध्ये ५ हजार रॉकेट हल्ले झाल्याचं बोललं जात आहे. तसंच अनेक दहशतवादी इस्रायलमध्ये घुसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन तेथील भारतीयांना सतर्क राहण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
सुरक्षित स्थळ असलेल्या ठिकाणी थांबा, कारण नसताना कुठेही बाहेर पडू नका, काही मदत हवी असल्यास वेबसाईटला भेट द्या. अशा सुचना भारताकडून तेथील नागरिकांस देण्यात आल्या आहेत. हमासने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच इस्राययचे अनेक नागरिक यात जखमी झाले आहेत. त्यामुळे इस्रायलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन भारत सरकारकडून करण्यात आलं आहे.
गाझा पट्टतून इस्रायलच्या दिशेने रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. याठिकाणी हमास या दहशतवादी संघटनेचं राज्य आहे. हमास आणि इस्त्रायल यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरु आहे. नुकत्यात काही वर्षातील हा सर्वात मोठा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे इस्रायलने युद्धाची तयारी सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.