
नवी दिल्ली : ५ ऑक्टोबरपासून मायदेशात रंगणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विश्वचषकाच्या कुंभमेळ्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघात मुंबईतील चार खेळाडूंना स्थान लाभले आहे.
कर्णधार रोहित शर्मा, चौथ्या क्रमांकावरील फलंदाज श्रेयस अय्यर, चौफेर फटकेबाजी करणारा सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर या चार मुंबईकरांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त, निवडण्यात आलेला संघ हा अपेक्षित असून आशिया चषकातील १७ पैकी १५ खेळाडू या संघात कायम आहेत. तिलक वर्मा व प्रसिध कृष्णा यांना विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले आहे.
हे महत्त्वाचे!
* भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील पहिली लढत खेळणार आहे.
* २७ सप्टेंबरपर्यंत भारतीय संघाला १५ खेळाडूंत बदल करण्याची मुभा आहे, मात्र यासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागेल. (खेळाडूला दुखापत झाली अथवा काही वैयक्तिक कारण असले तरच.)
भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव.