तरुण राहण्यासाठी दाम्पत्याचे मानवी मांस भक्षण

कोचीचे पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी या राक्षसी घटनेची माहिती देताना अनेक धक्कादायक खुलासे केले
तरुण राहण्यासाठी दाम्पत्याचे मानवी मांस भक्षण

मानवी मांस खाल्ल्यानंतर तरुण राहता येते, घरात धनदौलत येते, या अंधश्रद्धेतून केरळमधील दाम्पत्याने दोन महिलांची हत्या करून त्यांचे मांस भक्षण केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केरळमधील नरबळी प्रकरणात केला आहे. दाम्पत्याने दोन महिलांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर ते मांस शिजवून खाल्ल्याचा अघोरी प्रकार त्यांनी केला. या प्रकरणात या दाम्पत्यासोबत तिसरा आरोपीही सहभागी होता. या महिलांना ठार मारल्यानंतर त्यांचे रक्त भिंतींवर आणि जमिनीवर शिंपडले होते. हा काळ्या जादूचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

कोचीचे पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी या राक्षसी घटनेची माहिती देताना अनेक धक्कादायक खुलासे केले. ठार करण्यात आलेल्या दोन महिलांसोबत जे घडले, ते शब्दात व्यक्त करणे कठीण असल्याचे ते म्हणाले. धनदौलत प्राप्त करण्यासाठी रस्त्याकडेला लॉटरीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन महिलांना यात ओढण्यात आले. त्यांची नावे रोझली (४९) आणि पद्मा (५२) अशी आहेत.त्यातील एक कदवंथरा आणि दुसरी कालडी येथील रहिवासी होती. या दोघी अनुक्रमे जून आणि सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. त्यांचा शोध सुरू असताना हे नरबळीचे प्रकरण उजेडात आले. या महिलांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे जवळपास ५६ तुकडे करून पथनमथिट्टा आणि तिरुवल्ला येथे खड्ड्यात गाडले. त्यातील काही तुकडे त्यांनी शिजवून खाल्ले. या भयानक प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

मांत्रिकाच्या सल्ल्यावरून घडले हत्याकांड

ज्या दोघा महिलांची हत्या करण्यात आली, त्या रस्त्याच्या कडेला बसून लॉटरीची तिकिटे विकून उदरनिर्वाह करत होत्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शफी हा मांत्रिक आर्थिक संकटात असलेल्या लोकांचा शोध घ्यायचा. यासाठी त्याने फेसबुकवर श्रीदेवी नावाचे एक फेसबुक पेज सुरू केले होते. पारंपरिक उपचार पद्धतीची प्रॅक्टिस करणारे भगवालसिंह आणि लैला हे दाम्पत्य मोहम्मद शफीच्या संपर्कात आले. हे दाम्पत्य आर्थिक संकटात होते. त्यांना शफीने आपल्या जाळ्यात ओढले. घरात धनदौलत हवी असल्यास दोन महिलांचा बळी द्यावा लागेल, असे त्याने त्यांना सुचवले. शिवाय या महिलांना मारून त्यांचे मांस खाल्ल्यास चिरतरुण राहता येते, असेही या मांत्रिकाने त्यांना सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in