
चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील एका मंत्र्याकडे देण्यात आलेले खाते अस्तित्वातच नव्हते, अशी धक्कादायक माहिती आली आहे. मात्र, तरीही २० महिने त्या खात्याचे मंत्री म्हणून कुलदीपसिंग धालीवाल यांनी काम पाहिले. या प्रकारावरून पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी भगवंत मान यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर या पराभवाचा परिणाम पंजाबमध्येही दिसू लागला आहे. भगवंत मान हे दिल्लीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल हे पंजाब सरकारमध्ये हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप होत आहे. यावरून चांगलंच राजकारण तापले असतानाच आता पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, पंजाब सरकारमधील मंत्री कुलदीपसिंग धालीवाल यांना २० महिन्यांपासून जे खाते देण्यात आले होते. पण ते खाते अस्तित्वातच नाही, हे समजायला पंजाब सरकारला २० महिने लागल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. त्यामुळे एवढे दिवस भगवंत मान नेमकं काय करत होते, असे सवाल उपस्थित करत भाजपच्या नेत्यांनी भगवंत मान यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत.