
मुंबई : रेल्वेच्या तत्काळ तिकिटांचे आरक्षण सुरू होताच काही सेकंदात सर्व तिकिटे आरक्षित होतात. याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने रेल्वे मंडळाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर ती ३० मिनिटांच्या कालावधीपर्यंत आरक्षित होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर १ जुलैपासून केवळ आधार प्रमाणित वापरकर्त्यांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या संकेतस्थळ आणि अॅपद्वारे तत्काळ तिकिटे काढता येणार आहेत. तर १५ जुलैपासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी आधार आधारित 'ओटीपी' प्रमाणीकरण देखील अनिवार्य असणार आहे.
रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटे आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. गेल्या वर्षभरात ऑनलाइन तत्काळ तिकिटे आरक्षित करण्यात अडचणी आल्याचे १० पैकी ७ जणांनी मत व्यक्त केले आहे. तत्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू होताच काही मिनिटात तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात,अशी अनेकांची तक्रार आहे. वातानुकूलित डब्यांसाठी सकाळी १० वाजता आणि विना वातानुकूलित डब्यासाठी सकाळी ११ वाजता तत्काळ तिकीट आरक्षित होण्यास सुरुवात होते. परंतु तत्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात केल्यास, एका मिनिटांतच सर्व तिकिटे आरक्षित होऊन काही क्षणात तिकीट प्रतीक्षा यादीत जाते.