‘आप’ इंडिया आघाडीतून बाहेर; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांचे ऐक्य कमकुवत

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जोरदार धक्का देत शुक्रवारी आम आदमी पक्षाने (आप) ‘इंडिया आघाडी’सोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. ‘आप’ने उचललेल्या या पावलामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचे ऐक्य खिळखिळे होणार असल्याची चर्चा आहे.
‘आप’ इंडिया आघाडीतून बाहेर; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांचे ऐक्य कमकुवत
Published on

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जोरदार धक्का देत शुक्रवारी आम आदमी पक्षाने (आप) ‘इंडिया आघाडी’सोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. ‘आप’ने उचललेल्या या पावलामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांचे ऐक्य खिळखिळे होणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ‘अबकी बार ४०० पार’ची गर्जना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि एनडीएने निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘इंडिया आघाडी’ने भाजपला २४० जागांवर तर एनडीएला ३०० जागांच्या आत रोखले होते.

ऐक्य खिळखिळे

मात्र आता विरोधी पक्षांच्या या इंडिया आघाडीतील ऐक्य खिळखिळे होताना दिसत आहे. त्यातच शुक्रवारी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून, आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीसोबतचे आपले संबंध संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसह अनेक निवडणुका आपने स्वबळावर लढल्या होत्या.

काही पक्षांबरोबर समन्वय

दरम्यान, आपने इंडिया आघाडीपासून फारकत घेण्याची औपचारिक घोषणा केली आहे. याबाबत आपचे नेते संजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमचा पक्ष इंडिया आघाडीने बोलावलेल्या बैठकीमध्ये सहभागी होणार नाही. आमचा पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी आप हा इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही आम आदमी पक्ष संसदीय प्रश्नांवर तृणमूल काँग्रेस, डीएमके यांसारख्या विरोधी पक्षांसोबत समन्वय राखून त्यांना पाठिंबा देईल.

logo
marathi.freepressjournal.in