

नवी दिल्ली: पक्ष सोडणाऱ्या सात खासदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपतींकडे करण्यात येणार आहे, असे आपचे नेते संजय सिंह यांनी म्हटले आहे. याच संदर्भात, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे याबाबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. राज्यघटनेची १० वी अनुसूची किंवा पक्षांतर बंदी कायदा राज्यसभा किंवा लोकसभेतील कोणत्याही फुटीर गटाला किंवा गटाला मान्यता देत नाही, असे संजय सिंह यांनी स्पष्ट केले. फुटीर गटाकडे दोनतृतियांश बहुमत असले तरीही फरक पडत नाही असा दावा त्यांनी केला.
याच संदर्भात, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. आपल्या पक्षाच्या आमदारांसह राष्ट्रपतींची भेट घेऊन ते या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी शुक्रवारी आपचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला असून आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
"भाजपला पंजाबमध्ये वारंवार नाकारण्यात आले आहे. त्यामुळेच ते आता भीती दाखवून किंवा लालच देऊन भ्रष्टाचारमुक्त सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सातपैकी कोणीही लोकनेता नाही. एका सरपंचाचाही स्वतःचा व्होटबँक असतो, यांच्याकडे काय आहे?" असा सवाल मान यांनी उपस्थित केला.
सध्या पंजाबच्या ११७ सदस्यीय विधानसभेत आम आदमी पक्षाचे ९४ आमदार असून, पक्ष या प्रकरणावर कायदेशीर आणि राजकीय लढाई लढण्याच्या तयारीत आहे.