

नवी दिल्ली : नीट परीक्षेत झालेले कथित गैरप्रकार आणि पेपर लीक प्रकरणाच्या विरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरू असून, दीपके यांनी आता या आंदोलनासाठी शेतकऱ्यांची मदत आणि पाठिंबा मागितला आहे.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारले गेले आहे. "आम्ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जंतर-मंतरवर ठाण मांडून बसलो आहोत. जेव्हा शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत होते, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली होती. आता विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे," असे आवाहन अभिजित दिपके यांनी केले आहे.
शनिवारी मोठ्या संख्येने युवक आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, सायंकाळी ५ वाजेनंतर पोलिसांच्या परवानगीची मुदत संपल्याचे सांगत, पोलिसांनी आंदोलकांना जागा रिकामी करण्यास सांगितले होते. तरीही, दिपके आणि अनेक आंदोलक रात्रभर जंतर-मंतरवरच ठाण मांडून बसले. आंदोलकांनी असाही आरोप केला की, रात्रीच्या वेळी येथील वीजपुरवठा आणि पाण्याची सोय काही काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र, नंतर परिस्थिती पूर्ववत झाली.