रक्षाबंधनासाठी भावांकडे निघालेल्या 20 ते 25 बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर येत आहे. बांद्याहून फतेहपूरला जाणारी बोट यमुनेत उलटल्याने हा अपघात झाला. या बोटीत लहान मुलांसह 20 ते 25 महिला प्रवास करत असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. पाणबुड्यांद्वारे बुडालेल्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 25 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.
नदीच्या मधोमध आल्यावर बोट हेलकावे घ्यायला लागल्याने बोटीतील लोक घाबरून बोटीत इकडे तिकडे जाऊ लागले. यामध्ये एका बाजूला लोकांची संख्या वाढली आणि बोट उलटी झाली. या अपघातात महिला आणि लहान मुले बुडाली असून दरम्यान, तेथून जाणाऱ्या काही नावांनी बुडालेल्या लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, बोटीवर 40 ते 50 लोक होते. त्यातील 15 जणांना वाचवण्यात यश आले तर 25 ते 30 जण वाहून गेले.