एअर इंडियाच्या बोइंग ७८७विमानांची उड्डाणे रोखा

तांत्रिक बिघाड आणि देखभाल दुरुस्तीशी संबंधित काही समस्यांमुळे एअर इंडियाच्या सर्व बोइंग ७८७ विमानांची उड्डाणे तत्काळ थांबवण्याची मागणी भारतीय वैमानिक महासंघाने एका पत्राद्वारे नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केली आहे. यासंदर्भात डीजीसीएने विशेष ऑडिट सुरू केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एअर इंडियाच्या बोइंग ७८७विमानांची उड्डाणे रोखा
एअर इंडियाच्या बोइंग ७८७विमानांची उड्डाणे रोखा
Published on

नवी दिल्ली : तांत्रिक बिघाड आणि देखभाल दुरुस्तीशी संबंधित काही समस्यांमुळे एअर इंडियाच्या सर्व बोइंग ७८७ विमानांची उड्डाणे तत्काळ थांबवण्याची मागणी भारतीय वैमानिक महासंघाने एका पत्राद्वारे नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केली आहे. यासंदर्भात डीजीसीएने विशेष ऑडिट सुरू केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विद्युत प्रणालीची तपासणी

महासंघाने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत बी-७८७विमानांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर तांत्रिक समस्या समोर आल्या आहेत. यामुळे यामुळे प्रवाशांच्या आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याशिवाय, डीजीसीएकडे भारतात सुरू असलेल्या सर्व बोइंग ७८७विमानांच्या विद्युत प्रणालीची कसून तपासणी करावी, असेही म्हटले आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अमृतसर-बर्मिंगहॅम विमानात एआय-११७ मध्ये ४ ऑक्टोबर रोजी रॅम एअर टर्बाइन अचानक सक्रिय झाले, तर ९ ऑक्टोबरला व्हिएन्ना-नवी दिल्ली फ्लाइट एआय-१५४ ला तांत्रिक बिघाडामुळे दुबईला वळवावे लागले. या दोन्ही घटनांमध्ये ऑटोपायलट, फ्लाइट कंट्रोल सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम यांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये बिघाड दिसला. यामुळे विमानांची स्वयंचलित लँडिंग क्षमता बाधित झाली, परिणामी हवाई सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महासंघाने जूनमध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेकडे लक्ष वेधले. तसेच देशात बी-७८७ विमानांतील तांत्रिक बिघाडांची योग्य तपासणी केली जात नाही. यामुळे हवाई सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर, जेव्हापासून देखभालीचे काम नव्या अभियंत्यांच्या हाती आले आहे, तेव्हापासून अशा घटना वाढल्याचा दावाही करण्यात आला आहे.

तीन मुख्य मागण्या

नुकत्याच झालेल्या एआय-११७, आणि एआय-१५४ मध्ये झालेल्या घटनांची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी, विमानांची उड्डाणे रोखणे, एअर इंडियाच्या सर्व बी-७८७ विमानांची उड्डाणे तात्पुरती रोखावी आणि त्यांतील विद्युत प्रणालीसह वारंवार येणणाऱ्या तांत्रिक बिघाडाचा सखोल तपास व्हावा, तसेच डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष ऑडिट करावे.

एअर इंडियाचे निवेदन

दरम्यान, टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने तांत्रिक बिघाडाचे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच एआय-११७ मध्ये आरएटी सक्रिय होणे ही 'अनकमांड' घटना होती आणि यामुळे विमान अथवा प्रवाशांना कसल्याही प्रकारचा धोका नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in