
एअर इंडियाने येत्या पाच वर्षांसाठी आपल्या व्यवसायाचे लक्ष्य तयार केले आहे. येत्या पाच वर्षांत भारतातील ३० टक्के बाजारपेठ काबीज करण्याची योजना कंपनीने आखली आहे.
कंपनीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात आपला हिस्सा वाढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, देशातील बाजारपेठेत ही मोठा वाटा निर्माण करण्याचे कंपनीने ठरवले आहे. येत्या पाच वर्षांसाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवून आराखडा तयार केला आहे. ३० मोठी व लहान विमान ताफ्यात सामील करून घेतली जाणार आहेत. कंपनीने ‘विहान.एआय’ची घोषणा करताना सांगितले की, पाच वर्षांत कंपनीचे परिवर्तन केले जाणार आहे. नेटवर्क व ताफा यामध्ये मोठे बदल केले जातील. विश्वास, वक्तशीर विमानसेवा, तंत्रज्ञान आदींसाठी योजना आखली जाणार आहे. डीजीसीएच्या ताज्या आकडेवारीनुसार, कंपनीचा देशातील बाजारपेठेतील हिस्सा ८.४ टक्के आहे. कंपनी पाच क्षेत्रांवर काम करणार आहे. त्यात चांगला ग्राहक अनुभव, मजूबत संचालन, उद्योगाचे नेतृत्व व वाणिज्यिक दक्षता व नफा यावर लक्ष केंद्रित केले जाईल.