समाजवादी पक्षात फूट पडणार नाही; अखिलेश यादव यांचा दावा

शिवसेना (उबाठा) आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर लवकरच समाजवादी पक्षात (सपा) मोठी फूट पडणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
समाजवादी पक्षात फूट पडणार नाही; अखिलेश यादव यांचा दावा
समाजवादी पक्षात फूट पडणार नाही; अखिलेश यादव यांचा दावा (संग्रहित छायाचित्र)
Published on

लखनऊ : शिवसेना (उबाठा) आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर लवकरच समाजवादी पक्षात (सपा) मोठी फूट पडणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केल्याने खळबळ माजली आहे. मात्र, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावताना समाजवादी पक्ष अजूनही मजबूत आहे. प्रलोभने दाखवून आणि दबाव आणून इतर पक्षांमध्ये फूट पाडण्याचा इतिहास भाजपचाच राहिलेला आहे, असा आरोप त्यांनी केला.

सपा नेत्यांमध्ये असंतोष असल्याच्या शक्यतेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, भाजपने यापूर्वी अनेक पक्ष फोडण्यात यश मिळवले आहे. त्यांनी समाजवादी पक्षाच्याही अनेक आमदारांना आणि नेत्यांना आपल्या बाजूने वळवले होते. ते म्हणाले, उत्तर प्रदेशचा विचार केला तर सपाचे अनेक आमदार, विधान परिषद सदस्य आणि अगदी राज्यसभेच्या खासदारांनाही भाजपने आपल्याकडे ओढले. त्यामागे काहीतरी स्वार्थ, प्रलोभन किंवा भीती नक्कीच असेल... जे लोक घाबरतात, तेच आपला पक्ष सोडतात.

आपण भाजपमध्ये कोणतीही फूट पाडणार नसल्याचे पूर्वीच जाहीर केले होते, याची आठवण करून देत माजी मुख्यमंत्र्यांनी उलट भाजपवरच निशाणा साधला. मी आधीच सांगितले होते की मी भाजप तोडणार नाही. पण भाजप इतर पक्ष फोडण्यात आणि खासदार पळवण्यात व्यस्त असताना, उत्तर प्रदेशातील त्यांचे स्वतःचेच आमदार आता पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत.

समाजवादी पक्षात फूट पडणार नाही; अखिलेश यादव यांचा दावा
प्रादेशिक पक्ष अडचणीत

राजभर यांचा दावा

सपा पक्षामध्ये लवकरच मोठी फूट पडण्याची शक्यता असून अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच, भूतकाळातील कथित घोटाळ्यांच्या चौकशीच्या दबावामुळे सपाचे नेते चिंतेत असून ते भाजपमध्ये जाण्यास तयार असल्याचे राजभर यांनी म्हटले होते.

भाजपचा मुकाबला करायचाय तर...

अखिलेश यादव यांनी राजभर यांच्या या सर्व दाव्यांना केराची टोपली दाखवली आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांकडे हिंमत आणि दृढविश्वास असणे गरजेचे असल्याचे सांगत अखिलेश म्हणाले, जर भाजपचा मुकाबला करायचा असेल, तर आपल्याकडे शूर लोकांची टीम असायला हवी.

logo
marathi.freepressjournal.in