

पश्चिम मेदिनीपूर : दीदी, तुमचा वेळ आता संपली असून 'टाटा, बाय-बाय' म्हणण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चंडीपूर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, राज्यातील जनतेला त्रास देणाऱ्यांना आता सत्तेतून बाहेर जावे लागेल आणि भाजपचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. घुसखोरांना इशारा देताना शाह म्हणाले की, ४ मे रोजी मतमोजणी असून ५ मे रोजी भाजपचे सरकार होईल. त्यानंतर स्थापन घुसखोरांनी बांगलादेशात जाण्यासाठी तयार राहावे. चंडीपूर आणि आसपासच्या परिसरात पानांची मोठी लागवड होत असल्याने, भारत सरकारकडून येथे भव्य पान संशोधन केंद्र उभारले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच हिंसाचार करणाऱ्यांना इशारा देताना त्यांनी स्पष्ट केले की, २३ एप्रिल रोजी कोणीही घराबाहेर पडू नये, भाजपचे सरकार आल्यानंतर अशा प्रवृत्तींना पाताळातून शोधून काढून तुरुंगात धाडले जाईल.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यास काँग्रेस, कम्युनिस्ट आणि ममता बॅनर्जी यांचा विरोध होता. मात्र, २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कलम रद्द केले. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना बिर्याणी दिली जात होती, मात्र मोदी सरकारने उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक, पुलवामा नंतर एअर स्ट्राइक आणि पहलगाम हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून कंठस्नान घातले, असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.