
मदुराई : २०२६ मध्ये होणाऱ्या तमिळनाडू, प. बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
मदुराई येथे झालेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. शहा यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, तमिळनाडूत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता द्रमुकचा पराभव करणार आहे. भाजप व अण्णाद्रमुक एकत्रितपणे तमिळनाडूत रालोआ सरकार स्थापन करणार आहोत. द्रमुक सरकारला सत्तेतून हटवण्याचे व बदलाचे संकेत मिळत आहेत. तमिळनाडूतील जनतेला आता बदल हवा असून भाजप कार्यकर्ते त्यासाठी पूर्ण तयार आहेत, असे ते म्हणाले.
शहा म्हणाले की, एम. के. स्टालिन सांगतात, अमित शहा हे द्रमुकला हरवू शकत नाही. ते सत्य बोलत आहेत. मी नाही तर तमिळनाडूची जनताच तुम्हाला हरवेल. गेल्या १० वर्षांत भाजप सरकारने तमिळनाडूला ६.८० लाख कोटी दिले. तरीही मुख्यमंत्री स्टालिन विचारतात, केंद्राने तमिळनाडूला काय दिले? मी मुख्यमंत्री स्टालिन यांना आव्हान देतो की, २०२१ मध्ये द्रमुकने निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली का? हे जाहीररीत्या सांगावे, असे ते म्हणाले.
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यास तमिळमधून करा
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यास तमिळमधून सुरू करा. पंतप्रधान मोदी यांनी संसदेत सेंगोल स्थापन करून तमिळनाडूचा सन्मान केला. त्यासाठी स्टालिन हे पंतप्रधानांना पत्र लिहून धन्यवाद देतील, अशी मला आशा आहे.
दरम्यान, अमित शहा यांनी प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजा केली. मी तमिळ भाषेतून बोलू शकत नाही याबाबत मला खेद वाटतो, असे ते म्हणाले.