

नवी दिल्ली : दिल्ली आंदोलन प्रकरणी संसदेत विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर उत्तरे देण्यास आपण तयार आहोत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी स्पष्ट केले. विरोधक सभागृहाचे कामकाज चालवूच देत नसतील तर आत जाण्यात तिथे जाण्यात काय अर्थ आहे असा सवालही त्यांनी केला.
शहा यांनी बुधवारी विरोधी पक्षांना नीट परीक्षा घोटाळा, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि संबंधित सर्व विषयांवर लोकसभेत चर्चेसाठी रीतसर पत्र देण्याचे खुले आव्हान दिले. गृहमंत्री म्हणून मी स्वतः संपूर्ण चर्चेदरम्यान उपस्थित राहून विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहे,' असे ते म्हणाले.
संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, विरोधकांनी आज (बुधवारी) दुपारी २ वाजेपर्यंत लोकसभा अध्यक्षांना चर्चेसाठी पत्र द्यावे. आम्ही आज दुपारी ३ वाजेपासून उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत २४ तास सर्व पैलूंवर चर्चा करायला तयार आहोत. या प्रकरणात सरकारला काहीही लपवायचे नाही. विरोधकांना खरेच चर्चा करायची आहे की केवळ गोंधळ घालायचा आहे, हे आता त्यांनीच ठरवावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नीट पेपरफुटी आणि अयोध्या राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत गदारोळ सुरू केला होता. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीची अट घातली होती.
सभागृहात जायचे कशाला?
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या "गृहमंत्री पळून जात आहेत" या आरोपांवर शहा यांनी तीव्र आक्षेप घेतला. गुन्हेगार किंवा फरार यांसारखे शब्द अलीकडच्या काळातच संसदीय चर्चेत वापरले जाऊ लागले आहेत. २० जुलै रोजी अधिवेशन सुरू झाल्यापासून मी रोज संसदेतील माझ्या कार्यालयात उपस्थित आहे. परंतु, सभागृह चालू दिले जात नसेल, तर आत जाऊन बसण्यात काय अर्थ आहे, असा सवाल शाह यांनी केला.