

कराईकल : मुक्त व्यापारकरार आणि भारत-अमेरिका करारामध्ये शेतकरी आणि मच्छिमारांच्या हितांचे पूर्ण रक्षण करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी शहा यांनी केला.
राहुल गांधी यांनी दररोज खोटे बोलण्याची एक नवी परंपरा सुरू केली आहे, खोटे बोलणे, जोरात खोटे बोलणे आणि तेच पुन्हा पुन्हा सांगणे ही राहुल यांची नीती आहे, मात्र जनतेने आता तुमची खोटेपणाची फॅक्टरी ओळखली आहे, असे गृहमंत्री म्हणाले. मुक्त व्यापार करार आणि भारत-अमेरिका करारातील तरतुदींचा सखोल अभ्यास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकरी आणि मच्छिमारांसाठी १०० टक्के सुरक्षा निश्चित केली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे हित विकले गेले होते, आता २०२९ मध्ये मोदींच्या नेतृत्वाकाळील भाजपप्रणित 'एनडीए'च पुन्हा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.