पुरावा मागणे दुर्दैवी - शहा

काल माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहलगामधील दहशतवादी पाकिस्तानमधून आले याचा पुरावा मागितला होता. असा पुरावा मागणे दुर्दैवी आहे. सोमवारी ‘ऑपरेशन महादेव’दरम्यान पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांची ओळखही पटवण्यात आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर देताना सांगितले.
पुरावा मागणे दुर्दैवी - शहा
Published on

नवी दिल्ली : काल माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहलगामधील दहशतवादी पाकिस्तानमधून आले याचा पुरावा मागितला होता. असा पुरावा मागणे दुर्दैवी आहे. सोमवारी ‘ऑपरेशन महादेव’दरम्यान पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांची ओळखही पटवण्यात आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर देताना सांगितले.

पहलगामध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधून आले होते, याचा पुरावा काय, असा प्रश्न सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला होता. लोकसभेत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सविस्तर माहिती दिली.

पहलगाम दहशतवाद्यांकडे पाकमधील बंदुका, चॉकलेट

अमित शहा पुढे म्हणाले, पहलगामध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे पुरावे सरकारकडे आहेत. तीनपैकी दोघांचे पाकिस्तानातील मतदार ओखळपत्र सरकारकडे आहे. तसेच त्यांनी वापरलेल्या बंदुका आणि त्यांच्याकडे आढळलेली च़ॉकलेटसुद्धा पाकिस्तानातील आहे. यावरून हे अतिरेकी पाकिस्तानातून आले, हे स्पष्ट होते.

जेव्हा संसदेत चर्चा सुरू आहे. त्यावेळी चिदंबरम यांनी अशाप्रकारे मुद्दा उपस्थित केला. त्यांना नेमके म्हणायचे काय आहे? आज देशाचे माजी गृहमंत्री पाकिस्तानला क्लीनचिट देत आहेत. अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करून पाकिस्तानवर हल्ला का केला? अशा प्रश्नही ते एकप्रकारे उपस्थित करत आहेत, अशी टीकाही अमित शहा यांनी केली.

शहा यांची नेहरूंवर टीका

अमित शहा यांनी विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कॉंग्रेसच्या चुकांचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, सरदार पटेलांच्या विरोधाला न जुमानता पंडित नेहरू ‘युनो’त गेले. अक्साई चीनचा ३० हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनला देण्यात आला. युद्धबंदीमुळेच पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाली.

इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, हा एक मोठा विजय होता आणि आपल्या सर्वांना त्याचा अभिमान असेल, पण युद्धाच्या झगमगाटात जे घडले ते शिमला येथे एक करार झाला, त्यात पाकव्याप्त काश्मीर मागायला विसरले. जर त्यांनी त्यावेळी पाकव्याप्त काश्मीर मागितले असते तर आज ही परिस्थिती आली नसती. ‘पीओके’ मागितले नाही, उलट त्यांनी १५ हजार चौरस किलोमीटरचा भूभागही देऊन टाकला. त्यामुळे विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नाही, असे शहा म्हणाले.

...तर पाकिस्तानची निर्मितीच नसती!

काँग्रेसने फाळणी नाकारली असती तर पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती, पाकिस्तान हाच सर्व प्रकारच्या दहशतवादाचे मूळ आहे. गेल्या २० वर्षांच्या परिस्थितीची मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छितो. अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने २००२ मध्ये दहशतवाद संपवण्यासाठी ‘पोटा’ कायदा आणला. तो कोणी संपवला? काँग्रेसने. राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नव्हते. संयुक्त अधिवेशन बोलावून ‘पोटा’ कायदा मंजूर करावा लागला. ‘पोटा’ कायदा रद्द करुन तुम्ही कोणाला वाचवू इच्छित होता? असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसला केला.

logo
marathi.freepressjournal.in