केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच ‘एनआयए’ला अतिरिक्त अधिकार देण्यात आले असून २०२४ पर्यंत म्हणजेच येत्या दोन वर्षात प्रत्येक राज्यामध्ये एनआयएचे कार्यालय असेल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
हरयाणा राज्यातील सुरजकुंड या ठिकाणी राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्धाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. अमित शहा म्हणाले की, “देशभरातील सायबर गुन्हे, नार्कोटिक्स, सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले,राष्ट्रविरोधी कारवाया आणि अशाच प्रकारच्या इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण देशभरात संयुक्त योजना राबवण्यात येणार आहे. को-ऑपरेशन, को-ऑर्डिनेशन आणि कोलॅबोरेशन या तीन ‘सी’च्या आधारे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याच माध्यमातून सहकारी संघराज्यवादाची मूल्येही जपण्यात येतील.”