अंदमान समुद्रात बोट उलटली; रोहिंग्यांसह २५० हून अधिक जण बेपत्ता

बांगलादेशातून मलेशियाच्या दिशेने जाणाऱ्या निर्वासितांची एक बोट अंदमान समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांसह किमान २५० जण बेपत्ता असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित आणि स्थलांतरित संस्थांनी (यूएनएचसीआर आणि आयओएम) व्यक्त केली आहे.
अंदमान समुद्रात बोट उलटली; रोहिंग्यांसह २५० हून अधिक जण बेपत्ता
अंदमान समुद्रात बोट उलटली; रोहिंग्यांसह २५० हून अधिक जण बेपत्ताX (@airnews_mumbai)
Published on

ढाका : बांगलादेशातून मलेशियाच्या दिशेने जाणाऱ्या निर्वासितांची एक बोट अंदमान समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांसह किमान २५० जण बेपत्ता असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित आणि स्थलांतरित संस्थांनी (यूएनएचसीआर आणि आयओएम) व्यक्त केली आहे.

९ एप्रिल रोजी नऊ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये तीन रोहिंग्या आणि सहा बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. बांगलादेशी ध्वजवाहक जहाज 'एम.टी. मेघना प्राइड' हे चितगाववरून इंडोनेशियाकडे जात असताना, जहाजावरील कर्मचाऱ्यांना समुद्रात काही लोक तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने या नऊ जणांना वाचवून टेकनाफ पोलिसांच्या हवाली केले. सध्या हे सर्व नऊ बचावलेले नागरिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रवासामागची कारणे

म्यानमारमधील रखाइन प्रांतात सुरू असलेला हिंसाचार आणि निर्वासित छावण्यांमधील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रोहिंग्या नागरिक असुरक्षित आहेत. उत्तम रोजगार आणि चांगल्या आयुष्याच्या आशेने हे निर्वासित दलाल आणि तस्करांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडतात आणि अशा जोखमीच्या प्रवासाचा मार्ग निवडतात.

logo
marathi.freepressjournal.in