देशातील वाढत्या लोकसंख्येची तुलना राष्ट्रीय स्वंयसेवक सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी जंगलातील नियमांशी केली आहे. फक्त जिवंत राहणे हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट नाही. मानवाची अनेक कर्तव्ये असतात, त्याने ती वेळोवेळी पार पाडणे गरजेचे असते. फक्त खाणे आणि लोकसंख्या वाढवण्याचे काम तर प्राणीदेखील करतात. जो ताकदवान असतो, तोच जंगलात टिकून राहतो. दुसऱ्यांची रक्षा करणे हेच मनुष्य असण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.
कर्नाटकातील श्री सत्य साई विद्यापीठाच्या मानव उत्कृष्टतेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, गायक पंडित एम. व्यंकटेश कुमार हेदेखील उपस्थित होते. देशाच्या विकासावरही भाष्य करताना ते म्हणाले की, “अलीकडे देशाने खूप प्रगती केली आहे.देशवासीयांनी विकास पाहिला आहे. इतिहासातून धडा घेऊन भविष्याकडे बघून आपण विकास केला आहे. हे १०-१२ वर्षांपूर्वी कोणी बोलले असते तर ते गांभीर्याने घेतले नसते. आज जो विकास दिसतो, त्याचा पाया १८५७ मध्ये रचला गेला. मात्र, विज्ञान आणि बाहेरील जग यांच्यात संतुलनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. स्वामी विवेकानंदांच्या सिद्धांतांवर विकासाची वाटचाल पुढे होत राहिली.”
“कोणाची भाषा वेगळी, धर्म वेगळा, देशही वेगळा असेल तर ते वादाचे मूळ आहे. पर्यावरण आणि विकास यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे. अध्यात्मातूनच उत्कृष्टता प्राप्त होऊ शकते. कारण, विज्ञानाला अद्याप सृष्टीचा उगम समजलेला नाही. सर्व काही एकमेकांशी जोडलेले आहे, हे विज्ञानाला आढळून आले आहे. पण त्याला जोडणारा घटक सापडला नाही.”