
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) १ ऑक्टोबरपासून प्रवासी सेवेत दाखल झाली. मात्र, पहिल्याच महिन्यात या एक्स्प्रेसला किरकोळ अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस प्रत्येक वेळी समोरून येणाऱ्या जनावरांना धडकल्याने नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास तिसऱ्या एक्स्प्रेसलाही असाच अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे गुजरातमध्ये ही घटना घडली असून, त्याच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ अचानक एक गाय ट्रेनसमोर आल्याने हा अपघात झाला. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. यानंतर वंदे भारत एक्सप्रेस अतुल रेल्वे स्थानकावर जवळपास अर्धा तास थांबवण्यात आली. या अपघातात रेल्वे कपलरच्या कव्हरचेही नुकसान झाले असून बीसीयू कव्हरचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय रेल्वेला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईपही खराब झाली आहे. या अपघातात प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, गेल्या महिनाभरातील वंदे भारत एक्स्प्रेसची ही तिसरी घटना आहे.