नवी दिल्ली : एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे ११ वे राष्ट्रपती बनवण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतीपद तर लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपद देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु वाजपेयी यांनीच हा प्रस्ताव नाकारला, असा दावा वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार राहिलेले अशोक टंडन यांनी त्यांच्या 'अटल संस्मरण' पुस्तकात केला आहे.
अशोक टंडन यांचे पुस्तक ‘अटल संस्मरण’ प्रभात प्रकाशनने प्रकाशित केले. टंडन १९९८ ते २००४ या काळात वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार होते. त्यांनी पुस्तकात म्हटले आहे की, कुठल्याही पंतप्रधानाने बहुमताच्या जोरावर राष्ट्रपती बनणे भारतीय संसदीय लोकशाहीसाठी योग्य ठरणार नाही, असे वाजपेयींना वाटत होते. त्यामुळे वाजपेयी या प्रस्तावावर विचार करायला तयार नव्हते. ही प्रथा अत्यंत चुकीची होईल असेही वाजपेयी म्हणाले होते, असा खुलासा करण्यात आला आहे.
वाजपेयी-अडवाणी मतभेद
त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम यांना २००२ साली एनडीए आणि विरोधकांच्या पाठिंब्याने भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. २००७ पर्यंत अब्दुल कलाम यांनी ते पद सांभाळले. टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घडलेल्या अन्य घटनांचाही उल्लेख केला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या जोडीबद्दल सांगताना काही धोरणात्मक मुद्द्यांवर मतभेद असतानाही दोन्ही नेत्यांनी कधीही त्यांचे संबंध सार्वजनिकरित्या खराब होऊ दिले नाहीत, असेही पुस्तकात म्हटले आहे.
या प्रस्तावानंतर वाजपेयी यांनी राष्ट्रपतीपदासाठी सर्वसंमती मिळवण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी बैठकीचे आमंत्रण दिले. त्या बैठकीत सोनिया गांधी, प्रणब मुखर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग सहभागी झाले होते. या बैठकीत वाजपेयी यांनी पहिल्यांदा अधिकृतपणे राष्ट्रपतीपदासाठी ‘एनडीए’कडून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर बैठकीत काही काळ शांतता पसरली. त्यानंतर सोनिया गांधी यांनी मौन सोडले आणि या निवडीमुळे आम्ही हैराण आहोत असे म्हटले होते. आमच्याकडे पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, परंतु या प्रस्तावावर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे सोनिया गांधींनी बैठकीत सांगितले, असे पुस्तकात म्हटले आहे.