

तिनसुकिया / दिब्रूगड : अरुणाचल प्रदेशातील एका दुर्गम दरीत ट्रक कोसळल्याने आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून आणखी तीन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. या अपघातातून जिवंत राहिलेल्या एका मजुराने दोन दिवस पायपीट करून लष्करी तळ गाठला. त्यानंतर हा अपघात झाल्याचे लक्षात आले.
हा अपघात ८ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागातील अनजॉ जिल्ह्यातील हायुलियांग-चागलागाम रस्त्यावर झाला. तिनसुकियाहून आलेले २२ मजूर ट्रकमध्ये प्रवास करत होते, असे संरक्षण विभागाचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले. या अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या जबानीतून हा अपघात घडल्याचे समोर आले. १८ मृतदेह आढळले असून दोरांच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. हायुलियांगचे उपविभागीय अधिकारी यांनी अनजॉच्या पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारीही जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत आहेत, असे रावत म्हणाले.
रावत म्हणाले की, या अपघातातून बचावलेला एक मजूर दोन दिवसानंतर चिप्रा जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्सच्या छावणीत पोहोचला. लष्कराने अरुणाचल प्रदेशातील चागलागाम परिसरात मोठ्या प्रमाणात शोध व बचाव मोहीम हाती घेतली आहे. शोध पथके, वैद्यकीय पथके, स्थानिक पोलीस, एनडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.
चार तासांच्या शोधमोहिमेनंतर ट्रक रस्त्यापासून सुमारे २०० मीटर खोल दरीत आढळला. तो दाट झाडे, झुडपांमुळे रस्त्यावरून किंवा हेलिकॉप्टरमधून दिसत नव्हता," असे त्यांनी सांगितले.