जयपूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार, याकडे साऱ्या देशाच्या नजरा असताना राहुल गांधी हे इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीर केले आहे. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे गेहलोत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
गेहलोत म्हणाले, ‘‘प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. परंतु, सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहंकारात राहू नये. २०१४ मध्ये भाजपला केवळ ३१ टक्के मते मिळाली होती. उर्वरित ६९ टक्के मते त्यांच्या विरोधात होती. ‘इंडिया’ आघाडीचा ‘एनडीए’ ने धसका घेतला आहे. त्यामुळे २०२४ ला कोण पंतप्रधान होणार, हे निवडणुकांचे निकालच ठरवतील.”