गुवाहाटी : आसाम सरकारने गोमांसावर बंदी घातली आहे. सीएम हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस दिले जाणार नाही. समगुरी जागेवरील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपने गोमांस वाटल्याने काँग्रेसचा पराभव झाल्याचा आरोप केला होता. यावरील प्रत्युत्तरात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी भाजपच्या बैठकीनंतर सांगितले की, काँग्रेसने लिखित स्वरूपात दिले तर ते राज्यात गोमांस बंदी करण्यास तयार आहेत. गोमांस देऊन समगुरीची जागा जिंकता येईल का? असा सवालही सरमा यांनी केला होता.
सरमा म्हणाले की, मी रकीबुल हुसैन यांना सांगू इच्छितो की गोमांसावर बंदी घातली पाहिजे, कारण त्यांनी स्वतःच ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ते फक्त मला लिखित स्वरूपात देणे आवश्यक आहे. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्वांनी गोमांस खाणे बंद केले पाहिजे.
गोमांस बंदीबाबतची घोषणा करताना जलसंपदा मंत्री पियुष हजारिका म्हणाले की, काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत करावे अन्यथा पाकिस्तानात जावे.
आसाममध्ये गोमांस खाणे बेकायदेशीर नाही
आसाममध्ये गोमांस खाणे बेकायदेशीर नाही. मात्र, ‘आसाम कॅटल प्रिझर्व्हेशन ॲक्ट २०२१’नुसार ज्या भागात हिंदू, जैन आणि शीख बहुसंख्य आहेत अशा भागात आणि कोणत्याही मंदिर किंवा सत्राच्या (वैष्णव मठ) परिसरात गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी आहे.