

नवी मुंबई : तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाचा फटका देशातील सामान्य शेतकरी आणि कृषी माल विक्रेत्यांना बसला आहे. केळीची निर्यात करणाऱ्यांचे तर पूर्ण कंबरडे मोडले असून देशोधडीला लागल्यासारखी परिस्थिती झाली आहे.
युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात आखातात जाणारे १२०० ते १५०० हजार कंटेनर जेएनपीए बंदरात अडकून पडले होते. १५ दिवसांनंतर यातील ८०० ते १ हजार कंटेनर मार्गस्थ झाले. तर काही कंटेनरमधील माल स्थानिक बाजारपेठेत विकण्यासाठी आणला गेला.
दरम्यान, इराणमध्ये कंटेनर पाठविल्यानंतर तिथे युद्धाचा आधार घेत माल उतरवण्यासाठी व साठवणूक करण्यासाठी शिपींग कंपन्यांनी आव्वाच्चा सव्वा भाडे लावण्यास सुरवात केली. पूर्वी एका कंटेनरला २ ते ३ लाख असलेले भाडे थेट १५ लाख रूपयांपर्यंत पोचले. याचा फटका शेतकरी आणि निर्यातदार कंपन्यांना बसला. यातून हजारो टन केळी आहे त्या जागी सडून गेली आणि ज्या केळीची निर्यात झाली त्यांना विदेशातील स्थानिक शिपिंग कंपन्यांनी अधिकचे भाडे लावल्याने हाती काहीही लागले नाही.