जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

२४ जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे. ठाकूर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती.
जननायक कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न (मरणोत्तर) जाहीर झाला आहे. २४ जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली आहे. ठाकूर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाचे प्रतीक जननायक कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. दलितांचे सबलीकरण करण्यासाठी व त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात छाप पाडली आहे. हा पुरस्कार केवळ त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत नाही, तर अधिक न्याय्य समाज निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो.

दोन वेळा बनले होते मुख्यमंत्री

कर्पूरी ठाकूर यांना बिहारचे जननायक म्हणून संबोधले जाते. ते दोनदा बिहारचे मुख्यमंत्री बनले होते. पहिल्यांदा ते सोशालिस्ट पार्टी व भारतीय क्रांती दलाच्या सरकारचे मुख्यमंत्री बनले होते, तर दुसऱ्यांदा ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले होते.

स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगला

ठाकूर यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावात गोकुल ठाकूर व रामदुलारी देवी यांच्या घरी झाला. विद्यार्थी जीवनात ते राष्ट्रवादी विचारांशी प्रभावित झाले होते. स्वातंत्र चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी २६ महिने तुरुंगवास भोगला होता.

जननायक कर्पूरी ठाकूर

आज जननायक कर्पूरी ठाकूरजी यांची जन्मशताब्दी आहे. सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे करोडो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला. कर्पूरीजींना भेटण्याची संधी मला कधी मिळाली नाही, पण त्यांचे निकटवर्ती कैलाशपती मिश्रा यांच्याकडून मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे. ते न्हावी या मागासलेल्या समाजातील होते. असंख्य अडथळ्यांवर मात करत त्यांनी मोठे यश प्राप्त केले आणि सामाजिक उन्नतीसाठी काम केले.

जननायक कर्पूरी ठाकूरजी यांचे जीवन साधेपणा आणि सामाजिक न्याय या दुहेरी स्तंभांभोवती गुंफले आहे. अखेरच्या श्वासापर्यंतची त्यांची साधी राहणी आणि नम्र स्वभाव सर्वसामान्यांच्या स्मृतीत कायम राहिली. त्यांच्या साधेपणाचे गुणगान करणारे असंख्य किस्से आहेत, ज्यांनी त्यांच्यासोबत काम केले होते. ठाकूर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासह कोणत्याही वैयक्तिक बाबींसाठी स्वतःचेच पैसे खर्च करणे नेहमी कसे पसंत केले, याबाबतच्या आठवणी ते सांगतात. बिहारचे मुख्यमंत्री असताना राजकीय नेत्यांसाठी वसाहत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, पण त्यांनी स्वत:साठी याकरिता कोणतीही जमीन किंवा पैसा घेतला नाही. १९८८ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा अनेक नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावाला गेले होते. तेव्हा त्यांच्या घराची अवस्था पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले, एवढ्या मोठ्या माणसाचे घर इतके साधे कसे असू शकते!

त्यांच्या साधेपणाचे अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर काही वर्षांपूर्वी, १९७७ मध्ये ज्यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला होता तेव्हाचे द्यावे लागेल. त्यावेळी दिल्ली आणि बिहारमध्येही जनता दलाचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी जनता दलाचे नेते लोकनायक जे. पी. यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बिहारमध्ये जमले होते. प्रमुख नेत्यांच्या मांदियाळीत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूरजी फाटका सदरा घालून फिरत होते. आपल्या अनोख्या शैलीत चंद्रशेखरजी यांनी लोकांना काही पैसे दान करण्याचे आवाहन केले, ज्या निधीमधून कर्पूरीजी एक नवीन सदरा विकत घेऊ शकतील. मात्र कर्पूरीजी म्हणजे कर्पूरीजी होते, त्यांनी पैसे तर स्वीकारले मात्र ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केले.

जननायक कर्पूरी ठाकूरजी यांना सामाजिक न्यायाप्रति विशेष आस्था होती. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत एका अशा समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी कार्य केले जिथे प्रत्येकाला मग तो समाजाच्या कोणत्याही स्तरातील असो, संसाधनांचे समान वाटप केले, प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध असतील हे पाहिले. त्यांना भारतीय समाजातल्या व्यवस्थेतील असमानता दूर करायची होती.

आपल्या आदर्श आणि मूल्यांप्रति त्यांची निष्ठा इतकी दृढ होती की ज्या काळात काँग्रेस पक्ष सर्वव्यापी होता, अशा युगात राहून देखील, त्यांनी स्पष्टपणे काँग्रेसविरोधी भूमिका घेतली. कारण काँग्रेस आपल्या मूलभूत तत्त्वांपासून विभक्त झाली आहे याची त्यांना फार लवकर जाणीव झाली होती. त्यांची राजकीय कारकीर्द १९५० च्या दशकाच्या सुरुवातीस सुरू झाली आणि तेव्हापासून ते कामगार वर्ग, मजूर, लहान शेतकरी आणि तरुणांच्या संघर्षांना मोठ्या हिमतीने आवाज देत राहिले आणि विधिमंडळाच्या सभागृहातले एक सामर्थ्यवान प्रतिनिधी झाले. शिक्षण हा विषय त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळचा होता. त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात त्यांनी गरीबांसाठी शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अथक कार्य केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये शिक्षण द्यावे या विचारांचे ते पुरस्कर्ते होते ज्यामुळे लहान शहरे आणि खेड्यातील लोक शिक्षण घेऊन जीवनात यशोशिखरावर पोहोचतील. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीही अनेक उपाययोजना केल्या.

लोकशाही, वादविवाद आणि चर्चा हे कर्पूरीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक होते. लहानपणी त्यांनी भारत छोडो आंदोलनात स्वतःला झोकून दिले तेव्हा त्यांच्यातील हे धैर्य दिसले आणि जेव्हा त्यांनी आणीबाणीचा सर्वशक्तीनिशी प्रतिकार केला तेव्हा ते धैर्य पुन्हा दिसून आले. जेपी, डॉ. लोहिया आणि चरणसिंहजी यांच्या सारख्यांनी त्यांच्या अद्वितीय अशा यथार्थ कामगिरीची प्रशंसा केली.

मागासवर्गीयांना त्यांचे हक्काचे प्रतिनिधित्व आणि संधी मिळतील या आशेसह मागासवर्गीयांच्या अस्तित्वासाठीची कृती यंत्रणा बळकट करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका हे जननायक कर्पूरी ठाकूरजी यांच्या भारतासाठीच्या सर्वात महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक आहे. त्यांच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला, पण ते कोणत्याही दबावापुढे झुकले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली, धोरणे अंमलात आणली गेली, जिथे एखाद्याचा जन्म एखाद्याचे भाग्य ठरवत नाही या आधारावर या धोरणांनी अधिक समावेशक समाजासाठी पाया घातला. ते समाजातील सर्वात मागासलेल्या स्तरातील होते. पण त्यांनी सर्व लोकांसाठी काम केले. त्यांच्यामध्ये कटुतेचा कोणताही मागमूस नव्हता, हे वैशिष्ट्य त्यांना खरोखर महान बनवते.

गेली दहा वर्षं आमचे सरकार जननायक कर्पूरी ठाकूरजी यांच्या मार्गावर चालले आहे, आमच्या योजना आणि धोरणांमध्ये परिवर्तनशील सशक्तीकरण आणले आहे. कर्पूरीजींसारख्या काही नेत्यांना वगळून सामाजिक न्यायाची हाक केवळ राजकीय घोषणापुरती मर्यादित राहिली, ही आपल्या राजकारणाची सर्वात मोठी शोकांतिकाही आहे. कर्पूरीजी यांच्या दृष्टिकोनाने प्रेरित होऊन आम्ही त्यांचा दृष्टिकोन प्रभावी शासन मॉडेल म्हणून अंमलात आणले. मी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगू शकतो की, गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त करण्याच्या भारताच्या कामगिरीचा जननायक कर्पूरी ठाकूरजी यांना खूप अभिमान वाटला असेल.

हे लोक समाजातील सर्वाधिक मागासवर्गातील आहेत ज्यांना वसाहतवादी शासनापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे सात दशके मूलभूत सुविधा नाकारण्यात आल्या होत्या. त्याचवेळी प्रत्येक योजनेचे १००% लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे सुनिश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे सामाजिक कल्याणाबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचे दर्शन घडत आहे. आज इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि जमातीच्या समुदायांमधील लोक मुद्रा योजनेमुळे उद्योजक बनू लागले असताना कर्पूरी ठाकूरजींचे आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न साकार होत आहे. तसेच आमच्या सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणाचा विस्तार केला आहे. आम्ही इतर मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात यश मिळवले आहे (दुर्दैवाने ज्याला काँग्रेसने विरोध केला होता), जो आज कर्पूरीजींनी दाखवलेल्या मार्गावर काम करत आहे. आमची पीएम-विश्वकर्मा योजना भारतातील इतर मागासवर्गाच्या समुदायाच्या कोट्यवधी जनतेसाठी समृद्धीची नवी दालने देखील खुली करणार आहे.

मी स्वतःच इतर मागासवर्गातील असल्यामुळे जननायक कर्पूरी ठाकूरजींचा मी खूप आभारी आहे. दुर्दैवाने आपण कर्पूरीजींना अतिशय कमी वयात ६४व्या वर्षी गमावले. आपल्याला अतिशय जास्त गरज असताना आपण त्यांना गमावले. तरीही ते कोट्यवधी जनतेच्या हृदयात आणि मनात त्यांच्या कामामुळे कायम राहतील. ते खऱ्या अर्थाने जननायक होते!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in