उत्तरप्रदेशच्या कौशांबी येथील एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. कारखान्याला लागलेल्या आगीमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीन रुग्णवाहीकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे.शिवनारायण, कौसल अली, शाहिद अली अशी मृतांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात भीषण स्फोट होताच पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखान्यातील आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना कोखराज येथील भरवारी येथे घडली. कारखान्यात भयंकर स्फोट झाल्याने चार जणांचा मृत्यू झालाय.
शराफत अली असं कारखान्याच्या मालकाचं नाव सांगितलं जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत सहा जण जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेबाबत कौशांबीचे पोलीस अधिक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय, "भरवारी येथील कारखान्यात आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि काही लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सोसायटीपासून हा फटाका कारखाना खूप दूरवर असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाहीय. जे कामगार तिथे काम करत होते, त्यांचाच मृत्यू झाला आहे. ज्या मालकाचा कारखाना आहे. त्याच्याकडे कारखाना चालवण्याचा परवाना होता. या घटनेत ४-६ लोक जखमी झाले आहेत."