
बिहारमध्ये एका पतीने लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच माहेरी निघून गेलेल्या आणि घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पत्नीवर विचित्र सूड उगवला आहे. पतीच्या कृत्याने पत्नी हैराण झाली आणि तिने थेट पोलिस ठाणे गाठले. हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.
ही घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमधील आहे. येथील एका महिलेच्या फोनवर वारंवार वाहतूक नियम उल्लंघनाचे ई-चलन येत होते, पण ती कधी नियमांचं उल्लंघन करतच नव्हती. सुरूवातीला तिने दंड भरलेही. पण वारंवार चलन यायला लागल्यावर मात्र तिने पोलिसांशी संपर्क साधला आणि घटनेचा उलगडा झाला आहे.
...म्हणून पती घेतोय बदला!
बिहारच्या मुझफ्फरपूरमधील काझी मोहम्मदपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका महिलेचा विवाह गेल्या वर्षी पाटणा येथील एका व्यक्तीशी झाला होता. लग्नावेळी महिलेच्या वडिलांनी नवरदेवाला बाईक भेट दिली होती, पण ती बाईक महिलेच्या नावावर नोंदवण्यात आली होती. मात्र, लग्नानंतर दीड महिन्यातच पती-पत्नीमध्ये खटके उडाल्याने पत्नी पतीचे घर सोडून माहेरी परतली. थोड्याच दिवसांत परिस्थिती इतकी बिघडली की प्रकरण घटस्फोटासाठी न्यायालयात पोहोचले. याच दरम्यान, घटस्फोटाच्या मागणीमुळे संतापलेल्या पतीने जाणूनबुजून दुचाकी वापरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे पत्नीच्या नावावर वारंवार दंड आकारला जात होता.
पोलिसांनी काय सल्ला दिला?
महिलेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत चार चलन जारी केले आहेत, या सर्वांची माहिती त्यांच्या मुलीच्या फोनवर देण्यात आली होती. सुरुवातीला तिने दंड भरला, पण ते वाढतच गेल्याने तिने कारवाई करण्याचे ठरवले आणि पाटणा ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यांनी तिला स्थानिक पोलिस ठाण्यात नेले. पती तिची दुचाकी वापरत असल्याचे कसे सिद्ध करणार असे तिला पोलिसांकडून विचारण्यात आले. नवरा वाहन वापरत असल्याची पुष्टी करणारे शपथपत्र सादर करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे, जो या प्रकरणात पुरावा म्हणून काम करेल. सोशल मीडियावर आता ही विचित्र घटना चर्चेत आहे.