
भोपाळ : मध्य प्रदेश सरकारचे २००३ ते २०२३ चे रिपोर्ट कार्ड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. भाजप सरकारने २० वर्षांच्या काळात मध्य प्रदेशला लागलेला ‘बिमारू’ राज्याचा शिक्का पुसला आहे, असा दावा त्यांनी केला.
येथे झालेल्या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्ही. डी शर्मा, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा उपस्थित होते.
ते म्हणाले की, २००३ मध्ये राज्यातील जनतेने ऐतिहासिक निर्णय घेऊन ‘दिग्विजय सिंह’ यांच्या सरकारला नाकारले. त्यानंतर भाजप सरकारने २० वर्षांत राज्याला स्वयंपूर्ण केले. राज्यात गेली ५ दशके राज्य करणाऱ्या काँग्रेसने आपले रिपोर्ट कार्ड जाहीर करावे, असे आवाहन शहा यांनी दिले.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या २९ लोकसभा जागा जिंकणार आहे, असा दावा करून ते म्हणाले की, १९५६ मध्ये मध्य प्रदेशचे स्थापना झाली. त्यानंतर २००३ पर्यंत राज्यात काँग्रेसचे सरकार होते. तरीही त्यांना ‘बिमारू’ राज्याचा शिक्का पुसता आला नाही. विविध समाजकल्याण योजना राबवून भाजपने राज्याला विकासाच्या वाटेवर नेले. गहू निर्यातीत मध्य प्रदेश भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. गव्हाच्या निर्यातीत ४५ टक्के वाटा हा मध्य प्रदेशचा आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात चांगले रस्ते राज्यात बनले आहेत, असे ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील १.३६ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले आहेत. राज्याचे दरडोई उत्पन्न १.४० लाख रुपयांवर गेले आहे. ४४ लाख गरीबांना पक्के घर मिळाले आहे, असे ते म्हणाले.