बिहारमध्ये ३४ विद्यार्थ्यांसह बोट उलटली, १८ बेपत्ता

एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोध आणि बचावकार्य सुरू आहे
बिहारमध्ये ३४ विद्यार्थ्यांसह बोट उलटली, १८ बेपत्ता

पाटणा : बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट बागमती नदीत उलटून अपघात झाला. अपघातग्रस्त बोटीत ३४ विद्यार्थी होते. त्यापैकी १८ विद्यार्थी बेपत्ता आहेत. इतकी भीषण दुर्घटना होऊनही इथे मदत आणि बचावकार्य करणारी यंत्रणा पोहोचण्यास तासापेक्षा जास्त अवधी लागला. त्यामुळे मुझफ्फरपूरमधील नागरिकांच्या संतापाचा पारा चढला. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

मुझफ्फरपूरमध्ये गुरुवारी सकाळी एक बोट विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या बोटीत ३४ विद्यार्थी होते. बागमती नदीतून जाताना अचानक बोट डळमळू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर ती उलटली. स्थानिक रहिवासी राकेश कुमार यांनी सांगितले की, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले होते. यामुळेच नदीच्या मध्ये पोहोचल्यानंतर बोट डळमळू लागली. यानंतर बोट अनियंत्रित होऊन उलटली. नाविक आणि त्याच्या सहकाऱ्याने आधी काही मुलांना वाचवले. यानंतर स्थानिक लोकांनीही नदीत उडी घेतली आणि काही मुलांना बाहेर काढले. उर्वरित बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी अपघातस्थळी धाव घेतली, अशी माहिती मुझफ्फरपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी घटनेची चौकशी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in