पाकिस्तानचा इंच न इंच भूभाग 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात; संरक्षण मंत्र्यांचा इशारा

भारताला खात्री आहे की, आपले शत्रू आता ब्राह्मोसपासून सुटू शकणार नाहीत. पाकिस्तानी भूभागाचा प्रत्येक इंच आता आपल्या ब्राह्मोसच्या आवाक्यात आहे.
पाकिस्तानचा इंच न इंच भूभाग 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात; संरक्षण मंत्र्यांचा इशारा
Published on

लखनौ : ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता, पाकिस्तानची इंच न इंच जमीन आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहे, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पाकिस्तानला दिला. लखनौ येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

एप्रिल पहलगाममध्ये २०२५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, त्यानंतर अद्यापही

पाकिस्तानकडून भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम सुरूच आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे भारताच्या विरोधात सातत्याने वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. मात्र, आता भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले आहे.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी शनिवारी 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशाचे पुन्हा एकदा कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले की,विजय आता आपल्यासाठी मोठी गोष्ट राहिलेली नाही. विजय मिळवणे ही आपली सवय बनली आहे, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.

पाकिस्तानला इशारा

भारताला खात्री आहे की, आपले शत्रू आता ब्राह्मोसपासून सुटू शकणार नाहीत. पाकिस्तानी भूभागाचा प्रत्येक इंच आता आपल्या ब्राह्मोसच्या आवाक्यात आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या क्षमतेची फक्त एक झलक होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये जे घडले तो फक्त एक ट्रेलर होता. पण त्या ट्रेलरनेच पाकिस्तानला हे दाखवून दिले की जर भारत पाकिस्तानला जन्म देऊ शकतो, तर भारत आणखी काय करू शकतो, याबद्दल मला अधिक सांगण्याची गरज नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

आसिफ यांचे चिथावणीखोर वक्तव्य

काही दिवसांपूर्वी ख्वाजा आसिफ यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केले होते. आता युद्ध झाले तर भारत स्वतःच्या लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल, असे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा ख्वाजा आसिफ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले होते की, औरंगजेबाचा काळ सोडला तर भारत कधीही एकसंध नव्हता. त्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारतासह अफगाणिस्तानला धमकी देण्याचा प्रयत्न केला. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बोलताना ख्वाजा आसिफ यांनी याबाबत भाष्य केले की, आमचे सैन्य दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी सज्ज आहे.

logo
marathi.freepressjournal.in