

नवी दिल्ली : ‘भारत मंडपम’ येथे आयोजित होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी जगभरातील प्रमुख जागतिक नेते भारतात येत असल्याने दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कडक सुरक्षा आणि तात्पुरते रहदारी निर्बंध लादण्यात आले आहेत.
शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय १८ व्या ब्रिक्स परिषदेसाठी दिल्ली पोलिसांचे सुमारे १५,००० कर्मचारी, निमलष्करी दलांच्या २०० तुकड्या (कंपन्या) आणि दिल्लीभरात ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या पाळतीखाली राजधानीला सुरक्षेचे कडक कडे पुरवण्यात आले आहे.
दिल्ली वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शहर पूर्णपणे बंद राहणार नाही, परंतु व्हीव्हीआयपी कॉन्व्हॉय मार्गांवर प्रवाशांना तात्पुरता खोळंबा, वळवणे आणि निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते.
सुरक्षेची सोय जिथे परवानगी देईल तिथे वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच परदेशी पाहुण्यांच्या हालचालींदरम्यान वाहने थांबवण्याचा कालावधी निश्चित नसेल आणि सुरक्षेची परिस्थिती व प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती पाहून टप्प्याटप्प्याने वाहने सोडली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येणाऱ्या पाहुण्यांना जास्तीत जास्त सुरक्षा पुरवतानाच जनतेला किमान त्रास होईल याची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.